महाराष्ट्राच्या सुपुत्राने अबुधाबीमध्ये केली पाकिस्तानच्या दहशतवादाची पोलखोल
विदेश प्रतिनिधी
भारताने दहशतवादाचा सामना करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबूधाबीला ( युएई ) भेट दिली आणि तिथे सहिष्णुता मंत्रालयाचे मंत्री महामहिम शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान तसेच युएईतील अनेक प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीस युएईमधील भारताचे राजदूत श्री. संजय सुधीर हे देखील उपस्थित होते.
या चर्चांना अत्यंत महत्त्व होते आणि त्या मुख्यतः धोरणात्मक विषयांवर केंद्रित होत्या. बैठकीदरम्यान, युएईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. युएईने घेतलेल्या या भूमिकेचे शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. या सदस्यांमध्ये श्री. मनन कुमार मिश्रा, डॉ. सस्मित पात्रा, श्री. ई. टी. मोहम्मद बशीर, श्री. एस. एस. आहलुवालिया, श्री.अतुल गर्ग, बन्सुरी स्वराज आणि राजदूत श्री.सुजन आर. चिनॉय यांचा समावेश होता.