राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी व युवकांसाठी नव्या योजना मंजूर…
राज्य प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महिलांच्या बचतगटांसाठी ‘उमेद मॉल’, ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र न्यायालये, शेतकऱ्यांसाठी जलसिंचन व्यवस्थापनात सुधारणा आणि युवकांसाठी रोजगार संधी या क्षेत्रांत हे निर्णय केंद्रित होते.
महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. हे मॉल जिल्हास्तरावर उभारण्यात येणार असून, त्यात स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण महिलांना व्यवसाय व उत्पन्नाची नवी दारे खुली होतील
ग्रामपंचायतीशी संबंधित प्रशासकीय व कायदेशीर वाद जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘पंचायतराज न्यायालये’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना जलसिंचन प्रकल्पांतून योग्य प्रकारे आणि वेळेत पाणी मिळावे यासाठी पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. पाणी वितरण अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत करण्यासाठी शासनाने जलसिंचन व्यवस्थापन सुधारणा आराखडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘उमेद मॉल’ योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांनाही स्थानिक उत्पादन, विक्री आणि व्यवस्थापनामध्ये सामील होण्याची संधी दिली जाणार आहे. सरकारकडून या प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.