मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी महानगरपालिकेची विशेष तयारी..
मुंबई प्रतिनिधी-गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणानंतर विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्वंकष नियोजन केले आहे. दीड दिवस, पाच दिवस, सातवा दिवस तसेच अनंत चतुर्दशी या प्रमुख दिवशी होणाऱ्या विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
नगरातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र मार्ग आखण्यात आले असून, गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि स्वयंसेवक तैनात केले जाणार आहेत. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या तलावांमुळे पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तींचं विसर्जन करता येणार आहे
निर्माल्य संकलनासाठी मोठ्या प्रमाणावर कुंड्या आणि गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांनी फुले, हार, माळा यांसारखे निर्माल्य थेट या कुंड्यांमध्ये टाकावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. याशिवाय, समुद्रकिनाऱ्यांवर आणि प्रमुख विसर्जन स्थळांवर मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.
मुंबईत लाखो भाविक विसर्जनासाठी येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष पथके, नियंत्रण कक्ष आणि आरोग्य विभागाने तात्पुरती वैद्यकीय पथके तैनात करण्याची तयारी केली आहे. प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि तात्पुरत्या शौचालयांचाही समावेश या नियोजनात करण्यात आला आहे.
पालिकेच्या या तयारीमुळे भाविकांना विसर्जन सोयीस्कर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडता येणार आहे.