मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली
जालना, (प्रतिनिधी) – जालना शहर व परिसरातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि ढग फुटीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतमाल नष्ट झाला, घरांची पडझड झाली, जनावरांचे प्राण गेले तसेच रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या ढग फुटीमुळे शेतकर्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अनेक पूल वाहून गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जालना शहरातील सुमारे ८० टक्के भागात पाणी घरांत शिरले असून, काही ठिकाणी तीन फूटांहून अधिक पाणी घरांत भरले आहे. नागरिकांच्या घरांत सापसारखे प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी या परिस्थितीवर तात्काळ लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी पत्रात मागणी केली आहे की, जालना शहर व ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच, पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरती निवासव्यवस्था आणि आर्थिक मदत जाहीर करावी.
या आपत्तीमुळे शेतकरी व नागरिक हतबल झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य ती मदत करावी असे हि त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे