
मराठवाड्याचे रेल्वे प्रकल्प मार्गी लावावे’, पदवीधर मतदार संघाचे आमदार चव्हाणांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन.
प्रतिनिधी,औरंगाबाद: मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न, मागण्या, सर्वेक्षण, प्रस्ताव, वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील रखडलेले रेल्वे प्रकल्पाची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावावीत, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. मराठवाड्यातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आमदार चव्हाण यांनी श्री. दानवे यांची भेट घेत निवेदन दिले. मराठवाड्यात रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यातही बहुतांश मार्ग एकेरीच आहे. परिणामी रेल्वेगाड्यांची संख्याही कमी आहे. नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच मराठवाड्याची वर्षानुवर्षे निघून गेली आहेत. मराठवाड्यातील रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून सातत्याने केराची टोपली दाखविली जाते. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था आजही ‘जैसे थे’च असल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यातील रेल्वेचे वर्षानुवर्षे रखडलेले मनमाड-परभणी दुहेरीकरण, परळी-बीड-नगर रेल्वे मार्ग, रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-गेवराई जळगाव रेल्वे मार्ग, औरंगाबाद-नगर रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग, जालना-खामगाव रेल्वे मार्ग, लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड रेल्वे मार्ग आदी प्रकल्प मार्गी लागले तर मराठवाड्याचा औद्योगिक, शैक्षणिक विकासाबरोबरच पर्यटन वाढीस चालना मिळण्यास मदत होईल.



