लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी दि.20 ऑक्टोबर 2025 पर्यंत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.
तसेच या कालावधीत ई-केवायसी (e-KYC) न केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांचे दुकानदाराने मशीनवर अंगठा घेऊन ई-केवायसीचे काम पूर्ण करुन घ्यावे, याबाबत कोणतीही कुचराई करुन नये. ही लाभार्थ्यांना शेवटची संधी असून ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येईल.
ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी दुकानदाराकडे धान्य घेताना ई-केवायसी करुन घ्यावी. तसेच पात्र लाभार्थ्यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दि.20 ऑक्टोबर 2025 पर्यंत दुकानातून धान्याची उचल करावी. पुरवठा यंत्रणेने सर्व रास्तभाव दुकाने चालू राहतील याची दक्षता घ्यावी व सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी या कालावधीत दुकाने चालू ठेवून लाभार्थ्यांना 100 टक्के धान्याचे वाटप करावे.