राज्यभर कडाक्याच्या थंडीची लाट,राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली घसरला..
राज्य प्रतिनिधी -राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली घसरला असून, अवघ्या नोव्हेंबर महिन्यातच राज्यभर कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. कोकण किनारपट्टीवरील मुंबई शहरालाही या थंडीने गारठून टाकले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट नोंदवली जात असून, हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शीतलहरीचा इशारा दिला आहे. एकीकडे मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर माथेरान या थंड हवेच्या ठिकाणापेक्षा अधिक थंड ठरले आहे.
मायानगरी मुंबईत थंडीचा मुक्काम चांगलाच वाढला असून, शहराच्या किमान तापमानाने पुन्हा एकदा मोठी घट नोंदवली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सतरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली, जो या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. हे तापमान मुंबईच्या सरासरी किमान तापमानापेक्षा तब्बल तीन पूर्णांक आठ अंश सेल्सिअसने कमी आहे, ज्यामुळे मुंबईकर अक्षरशः गारठून गेले आहेत.