जयऱ्या आत्मचरित्र पुस्तकाचे नामदार श्री सुशील कुमारजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन..
मुबंई प्रतिनिधी-
:विद्रोही लेखक व कवी श्री जयराम गणपत सोनवणे या लेखकाचे आत्मचरित्र लिहिण्याचे पुस्तक रुपी मांडण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी ठरले.दि.२६ डिसेंबर २०२५ रोजी एम आय जी क्लब सभागृह बांद्रे पूर्व येथे मान्यवर वाचक लेखक हितचिंतक व समाज बांधवांच्या उपस्थितीत माननीय नामदार श्री सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते जयऱ्या या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताने व विविध कविताने करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सुशीलकुमारजी शिंदे, माँ जिजाऊ चे १४वे वंशज श्री संभाजी जाधव, दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे,दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संतोष भोईर,डॉक्टर चित्रा कळंबे, कवी साहित्यिक श्री ना.म शिंदे, ज्येष्ठ तज्ञ श्री राजीव निळकंठ श्रीखंडे, लेखक व साहित्यिक श्री मोहन जाधव, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री दिलीप गाडेकर,प्रमुख आयोजक श्रीराम कोकणे, समाज बांधव श्री यशवंत नारायणकर श्री राजेश खंदारे,श्री मनोहर सोनवणे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती
पुस्तक प्रकाशाचे वेळी नामदार सुशीलकुमारजी शिंदे यांनी जयऱ्या या आत्मचरित्र पुस्तकाचे दोन ते तीन वेळा वाचन करून त्यातील सोलापूर येथील नानज गावातील जुन्या आठवणीं व संदर्भांना उजाळा दिला. ६०वर्षांपूर्वी जयऱ्या नावाचा बालक ज्याच्या घरी दारिद्र्य, गरिबी,उपेक्षिता,अशिक्षित पणा पण कष्ट करून खाण्याची वृत्ती पडेल ते काम करायचं आई-वडिलांच्या सहाऱ्याशिवाय, शिक्षणाशिवाय कष्ट करण्यासाठी उपाशी बाहेर पडलेला चेहरा आज मुंबईसारख्या शहरात स्वतःचे कुटुंब सावरून मुलांना मार्गी लावून मार्गी लावून समाजकार्यात लेखन कार्यात गुंतून घेऊन स्वतःचे आत्मचरित्र लिहिले हे कौतुकास पात्र आहे. याचा आदर्श नवलेखक समाज बांधवांनी घ्यायला हवा असे आव्हान केले.त्याचबरोबर जयरामने आता वयाप्रमाणे मुक्त जीवन व स्वच्छंद जीवन जगावे असा सल्लाही दिला
त्यानंतर श्री संभाजीराव जाधव यांनी जयऱ्या या पुस्तकातील संदर्भातील आत्मचरित्र प्रामाणिकपणे मांडल्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या कष्टा बद्दल श्री सोनवणे यांची कौतुक केले. दलित चळवळीतील श्री संतोष भोईर यांनीही स्वतः प्रस्तावित देताना जयराम यांच्या अशिक्षितपणाबद्दल तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आणि विद्रोही लेखनाबद्दल ही व्यक्ती किती संवेदनशील असू शकते. परिस्थितीवर शिक्षणावर मात करत कवी लेखक झाले याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.दैनिक मुंबई मित्र चे संपादक श्री अभिजीत राणे यांनीही या पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.डॉक्टर लेखिका चित्रा कळंबे यांनी एका अशिक्षित माणसाने ज्ञानशक्ती सरस्वती यांनाच खेचून आणले असे गौरव उद्गार काढले.ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री दिलीप गाडेकर यांनी जवळून पाहिलेला जयऱ्या व त्यांचे कुटुंब यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापूर्वी दोन कवितासंग्रह व आताचे आत्मचरित्र याबद्दल मित्रपरिवार हितचिंतक याचा मोठा वाटा आहे हे सांगायला विसरले नाहीत.
यावेळी साधू कटके, शंकर बळी,शशिकांत सोनवणे व अरुणोदय वॉकर्स असोसिएट, बांद्रा मॉर्निंग वॉकस ग्रुप धारावी यांचेही योगदान मोलाचे ठरले.
कार्यक्रमाचे अखेरीस लेखक जयराम सोनवणे आणि त्यांचे कुटुंबीय यांचे नामदार श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून कौतुक करण्यात आले