देशभरात मकर संक्रांतीचं पर्व- देशासह महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…
राज्य प्रतिनिधी: देशभरात मकर संक्रांतीचं पर्व सुरू असतानाच हवामानातही काही बदल होताना दिसत आहेत. धुक्याची चादर अद्यापही कायम असल्यानं केंद्रीय हवामान विभागानं उत्तरेकडील अनेक राज्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा जारी केला आहे. तर, धुक्यामुळं मध्य भारतासह उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अडचणीची परिस्थिती उदभवू शकते असा इशारा लागू करण्यात आला आहे. दरम्यान दक्षिणेकडे होणारी कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करताना दिसत आहे. ज्यामुळं राज्याच तापमानात चढ- उतार होत असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये किमान तापमाना काही अंशांनी वाढून पुढील 24 तासांनंतर त्यात पुन्हा एकदा घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे,
उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार…मागील 24 तासांमध्ये धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली, जिथं पारा 7 अंशांपर्यंत पोहोचला होता. तर, नागपूर, गोंदिया, यवतमाळमध्ये पारा 11 अंशांवर स्थिरावला होता. पुढील 24 तासांमध्ये या स्थितीत फारसा बदल होणार नसून, राज्याच्या काही भागांमध्ये गारठा कायम राहणार असून, प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम असेल. मात्र राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, रायगड, पालघर इथं दमट हवामान वाढणार असून, पहाटेचा गारठा वगळता थंडीचा प्रभाव कमी होताना दिसेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं दक्षिण आणि उत्तरेकडे बदलणाऱ्या हवामानाच्या स्थितीचा राज्यावर संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील काही भगत रात्री अवकाळणी पावसाच्या सरी कोसळल्या,हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, सकाळी थंडी दुपारी उन्ह आणि रात्री पाऊस पडल्याने हे वातावरण नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानल जाऊ लागलंय.
देशात पूर्वोत्तर मान्सूनला पूरक स्थिती…केंद्रीय हवामानाशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं जारी केलेल्या माहितीनुसार देशात सध्या पूर्वोत्तर मान्सूनसाथी पूरक स्थिती निर्माण होत असून, त्यामुळं तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ, माहे आणि लगतच्या किनारपट्टी क्षेत्र, प्रामुख्यानं आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.