कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र; चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर
कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र; चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर
जालना, प्रतिनिधी :- सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी बुद्धिमत्तेत साठवून ठेवणे आणि ते वेळेवर आठवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारतातील संगणक क्रांतीनंतरचा हा सर्वात मोठा बदल असून कृषीप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे कृषी तंत्रज्ञानाची प्रगती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख्य वक्ते म्हणून फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर, मॅजिकचे मकरंद कुलकर्णी, रितेश मिश्रा, डॉ.प्रसन्न भोगले यांच्यासह डॉ.मंदार कुलकर्णी, डॉ.दीपक बोरनारे, डॉ.गोपाळ शिंदे, प्रसाद कोकिल, सौरभ कदम, पुजा गोशेर, पी.टी.यशराज, मॅजिकचे व्यवस्थापक डी.एम.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीमधील पिकांचे नियोजन, हवामानाचा अंदाज आणि कीड नियंत्रण यासाठी एआय तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत, मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता अमर्याद असून ती अचूक निर्णय प्रक्रियेत मोठी मदत करते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमधील उत्पादन कसे वाढवता येईल आणि जोखीम कशी कमी करता येईल, यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर म्हणाले, मानवी बुद्धिमत्ता जे सांगू शकत नाही, ते एआय सांगू शकते. शेतीमध्ये विविध ऋतूंमध्ये काढलेली छायाचित्रे हा केवळ डेटा नसून, त्यापासून शिकणारी मशिन भविष्यातील संकटांचा अंदाज देऊ शकते. अन्नाची वाढती मागणी, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी एआय माहितीचे अचूक विश्लेषण करते. यामुळे पिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या तात्काळ शोधणे शक्य होते. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी स्मरणात ठेवणे कठीण झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज बनली आहे. मात्र, आपल्याकडे ‘चॅटजीपीटी’लाच एआय समजले जाते, ही चुकीची संकल्पना आहे. वास्तवत: एआय ही कोणतीही जादू नसून ती माहिती विश्लेषणाद्वारे अचूक निर्णय घेण्याचा एक सक्षम पर्याय आहे. तरी कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यशाळेतून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमधील उत्पादन कसे वाढवता येईल आणि जोखीम कशी कमी करता येईल, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मॅजिकचे व्यवस्थापक डी. एम. राठोड यांनी केले. या कार्यक्रमास कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, संशोधक, तज्ज्ञ, शेतकरी, विद्यार्थी यांची उपस्थित होते