
श्री गुरु तेग बहादूर यांच्या विचार, कार्यावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे शुक्रवारी बक्षीस वितरण…
कोल्हापूर, प्रतिनिधी : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता विभागीय माहिती कार्यालयात होणार आहे.
विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवन, कार्यावर आधारित कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध प्राप्त झाले. तर घोषवाक्य स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून घोषवाक्य प्राप्त झाले.राज्य शासनामार्फत नवी मुंबई येथील खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवा पिढीच्या मनात त्याग, शौर्य आणि श्री गुरु तेग बहादुर यांच्या शौर्याचा इतिहास पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासी तसेच भगत नामदेव संप्रदाय (वारकरी) या समाजाचे प्रतिनिधी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
नवी मुंबई येथील खारघर येथे होणाऱ्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे
00000



