
नांदेड परिसरातील पूर परिस्थितीमुळे नदीत गणपतीचे विसर्जन नको
नांदेड – प्रतिनिधी श्री गणेशाची विधीवत स्थापना झाली आहे. आता दीड, पाच, सात आणि दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मात्र, नदीकाठी असलेली पूरपरिस्थिती पाहता भाविकांनी नदीमध्ये श्री गणेशाचे विसर्जन करू नये. त्याऐवजी आपआपल्या घरी किंवा आपल्या परिसरातील श्री गणेश मंडळाकडे आपली गणेश मुर्ती विसर्जनासाठी द्यावी, असे आवाहन नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेचे (Nanded) अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिलेल्या पत्रकात आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दरर्षीप्रमाणे विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे.
शहरातील काही नागरिकांकडून दीड, पाच व सात दिवसांच्या कालावधीसाठी श्रींची स्थापना करण्यात येते व त्यानंतर गणेश मुर्तीचे विसर्जन गोदावरी किंवा आसना नदीत करण्यात येते. सद्य:स्थितीत गोदावरी आणि आसना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अशा वेळी श्री विसर्जनासाठी तसेच अन्य कारणाने नदीकाठी जाणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



