धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी, प्रतिनिधी पर्यटनाला चालना देण्यासाठी जलसंपदा विभागाने धरण परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले असून, या संदर्भातील काम सुरू झाले आहे. जायकवाडी, माजलगाव, इसापूर या धरणांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे व भंडारदरा परिसरात पर्यटन केंद्रे विकसित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डॉ. विखे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी धरण पर्यटनासंदर्भातील धोरणाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागांचा उपयोग पर्यटन विकास केंद्रांसाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी एक निश्चित धोरण तयार करण्यात आले असून, बहुराष्ट्रीय कंपन्या याकामी सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे.
महामंडळासाठी आर्थिक स्रोत निर्माण व्हावेत तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. नवीन धोरणानुसार वॉटर स्पोर्ट्स व रिसॉर्ट्स उभारून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आल्याचेही जलसंपदामंत्र्यांनी स्पष्ट केले.