
सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप
जालना, प्रतिनिधी:- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. यावेळी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनी ट्रॅक्टर योजना या योजनांमधील निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीमती मोदाळे यांनी प्रास्ताविकात शासनाच्या या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा संकल्प सोडला आहे. महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी होता, हा डॉ. बाबासाहेबांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णयानुसार,दि.8 ते 14 एप्रिल या काळात जिल्हाभरात व्याख्याने, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात निवडपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बदनापूर येथील शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमधील कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अंबोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
-*-*-*-*-



