कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके
कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके….
नवी दिल्ली प्रतिनिधी
कोलंबियामधील बुकारामंगा इथे 5 ते 12 जुलै 2026 दरम्यान आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खाली नमूद केली आहेत :
कनिष्क जैन (सुवर्ण) – पुणे, महाराष्ट्र,रिद्धेश अनंत बेंडाळे (सुवर्ण) – इंदूर, मध्य प्रदेश रिशित गर्ग (सुवर्ण) – द्वारका, नवी दिल्ली श्रेष्ठ सुरैया (सुवर्ण) – मुंबई, महाराष्ट्र स्वरित जोशी (सुवर्ण) – अहमदाबाद, गुजरात
मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील मूलभूत संशोधन संस्थेचे , प्रा. अन्वेश मुजुमदार (HBCSE – TIFR – Homi Bhabha Centre for Science Education – Tata Institute of Fundamental Research) आणि मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ. लीना जोशी या दोघांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले.
यासोबतच कोलकाता इथल्या (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे)प्रा. आनंद दासगुप्ता आणि रत्नागिरीतील गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाच्या निशा केळकर हे देखील वैज्ञानिक निरीक्षक म्हणून संघासोबत सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या देशनिहाय पदक तालिकेत भारताने चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले. या स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेत्याचा विशेष पुरस्कार दक्षिण कोरियाच्या विद्यार्थ्याला मिळाला, तर प्रायोगिक श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार इराणच्या विद्यार्थ्याने पटकावला.
या स्पर्धेत एकूण 51 सुवर्ण, 80 रौप्य आणि 97 कांस्य पदके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत 85 देशांतील एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडच्या इतिहासात भारताने पाच सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने अशी कामगिरी केली होती.
पाच तासांच्या सैद्धांतिक श्रेणीतील स्पर्धेत पॅरामॅग्नेटिक कूलिंगचे उष्मागतिकी (थर्मोडायनामिक्स), कॉफीच्या कपमध्ये परावर्तित होणाऱ्या प्रकाशातील कॉस्टिक्स आणि कस्प्स, ओझोनचे फोटोआयनायझेशन आणि इलेक्ट्रॉन – पॉझिट्रॉन जोड्यांची कार्यपद्धती यांसारख्या विविध विषयांवर तीन प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वच भारतीय विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताचे काही विद्यार्थी अगदी संपूर्ण गुण मिळवण्याच्या समीप पोहोचले.
स्पर्धेअंतर्गतची प्रायोगिक श्रेणीतली स्पर्धा पाच तासांची होती. याअंतर्गत विद्यार्थ्यांना द्रव्यांमधील उष्मागतिक प्रक्रिया आणि उष्णता हस्तांतरणाशी संबंधित अनेक घटकांचा अभ्यास करण्याचे आव्हान देण्यात आले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी प्रायोगिक श्रेणीतही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड कक्ष तसेच काही निमंत्रित शिक्षकांनी, तसेच मार्गदर्शकांनी प्रशिक्षण दिले. मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील अभिमुखता केंद्रात, तसेच स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी झालेल्या शिबीरांमध्ये हे प्रशिक्षण दिले गेले.
राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड सुकाणू समिती, शिक्षक संघटना तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अणुऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आणि शिक्षण मंत्रालय या सर्व विभाग आणि संस्थांनी या स्पर्धेसाठी निधी पुरवठ्याची जबाबदारी सांभाळली, तसेच ऑलिम्पियाड कार्यक्रमाला सातत्याने भक्कम पाठबळ पुरवले आहे. यामुळेच भारताच्या या प्रतिभावान विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पटलावर चमक दाखवणे शक्य झाले आहे.
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधला भारताचा हा 27 वा सहभाग होता. या सर्व स्पर्धांमध्ये, भारताच्या जवळपास 44% विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके, 41% विद्यार्थ्यांनी रौप्य पदके, तर 10% विद्यार्थ्यांनी कांस्य आणि 5% विद्यार्थ्यांनी विशेष पुरस्कार मिळवले आहेत. गेल्या दहा वर्षांत या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी एकतर सुवर्ण (62%) किंवा रौप्य (38%) पदके जिंकली आहेत.