
10 टक्के पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत मोरबे धरणात प्रत्यक्ष 36.470 द.ल.घ.मी. (19.11%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता व भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार दि. 25 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा गरजेसाठीच वापर करून अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अनुषंगाने -• नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी दैनंदिन जीवनात पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.• घरातील कामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका, त्याऐवजी भांडयामध्ये पाणी घेऊन कामे करावीत.• पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेत आवश्यक तितकेच पाणी घेऊन प्यावे.• आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.• वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होऊ शकतो.• नळ तसेच वॉश बेसीनचा नळ यांचा प्रवाह मर्यादित करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्या तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असून अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.• उपहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पाणी दयावे, अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या ग्लासांमधील पाणी वाया जाणार नाही.• सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. त्यामध्ये कोठेही गळती आढळल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही.• छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हर फ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठया प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्य आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.• वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा व नळाला पाईप न लावता भांडयाने पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहन पूसावे. गरज नसताना घरातील पाण्याचे नळ बंद करावेत.• बांधकामासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करु नये. एकूणच दैनंदिन व्यवहारात पाणी बचतींच्या उपाययोजना अंगिकारणे सहजशक्य आहे, त्याचा अवलंब करुन नवी मुंबईकरांनी शक्य तितके पाणी बचत करावे, पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
0000



