
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या
इंचलकरंजी प्रतिनिधी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ नरेंद्र मोदींनी घेतली, पण ठाकरे सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त मोहीम हाती घेतली आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेत आता मला जो प्रतिसाद मिळत आहे, ती क्रांतीची सुरवात आहे, आम्ही आता हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची तक्रार देण्यासाठी कोल्हापूर येथे जात असताना त्यांनी वाघवाडी फाटा येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माजी आमदार भगवानराव साळुंखे, सी एस पाटील, संजय हवालदार, रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.किरीट सोमय्या म्हणाले, कालपासून रस्त्यावर विविध ठिकाणी आणि रात्री-मध्यरात्री रस्त्यात कार्यकर्ते थांबून मला प्रतिसाद देत आहेत. ही क्रांतीची सुरवात आहे.. त्यांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आमचा संकल्प आहे. या सरकारने खुप म्हणजे खूप नाटके केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पोलीस ठाण्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचे बारा महिन्यात आम्ही दोन डझन घोटाळे बाहेर काढले. चौकशी सुरू झाली आणि कारवाई सुरू झाली की हे कुठे तरी गायब होतात. अनिल देशमुखचाचा पत्ता कुणाला माहीत आहे? फक्त ठाकरे आणि शरद पवारांना माहितीय, कारण त्यांनीच त्याला लपवले आहे. देशमुख गायब, मुंबईचे पोलीस आयुक्त फरार झाले. मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये भरती झाले, आता हळूहळू चार महिन्यात ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ अर्धे गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल. हे सगळे बदमाश आहेत.



