
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; ५९ जातींचा सहभाग, लाखोंचा जनसागर उसळणार : आयोजक
जालना, प्रतिनिधी : अनुसूचित जातींमधील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात जालना जिल्ह्यातील आंबेडकरी समाज आणि अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संयुक्त वतीने आज मंगळवार, सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आज हॉटेल मधुबन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, ॲड. शिवाजीराव आदमाने, डॉ. सुशील सूर्यवंशी, संदीप खरात, महेंद्र रत्नपारखे, हरिश रत्नपारखे, प्रभाकर घेवंदे,ॲड.दशरथ इंगळे,सिद्धार्थ चव्हाण,दिनेश आदमाने,दादाराव लहाने, राहुल रत्नपारखे, अरुण वाघमारे, राजेश सदावर्ते, रवी मस्के, भैयासाहेब बोबडे, राष्ट्रपाल जाधव, मधुकर बोबडे, रितेश चौधरी यांची उपस्थिती होती.
दरम्यान पत्रकार परिषदेत आयोजकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सांगितले की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा सामाजिक न्याय, समता आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे समाजात कृत्रिम भेद निर्माण होत असून, अनेक दशकांच्या सामाजिक ऐक्याला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आयोजकांनी आरोप केला की, “फोडा आणि राज्य करा” या वसाहतवादी धोरणाची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र दिसत आहे. समाजात जातीजातीत अविश्वास आणि वैमनस्य निर्माण करणाऱ्या निर्णयांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असून, सर्वसामान्य जनता त्याची किंमत मोजत आहे, असा दावा त्यांनी केला.
सरकारने सामाजिक प्रश्न सोडविण्याऐवजी समाजात विभागणी निर्माण करणारी भूमिका घेतल्याचा आरोप करत आयोजकांनी सांगितले की, उप वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आयोजकांच्या मते, जालना जिल्ह्यातील ५९ अनुसूचित जाती या मोर्चात एकत्रित सहभागी होणार असून, हा मोर्चा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या मोर्चांपैकी एक ठरेल. हजारो नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर, डॉ. भीमराव आंबेडकर हे करीत असून प्रामुख्याने आमदार राजकुमार बडोले, माजी मंत्री बबनराव घोलप, ऍड. सुरेश माने यांची उपस्थिती असणार आहे.
मस्तगड येथून मोर्चाची सुरुवात
, सकाळी ११ वाजता मस्तगड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ होईल. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत हा मोर्चा अंबड चौफुली येथे सभेमध्ये रूपांतरित होईल. त्यानंतर प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन उपवर्गीकरणाच्या विरोधातील निवेदन सादर करणार आहे.
यावेळी आयोजकांनी जालना जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजबांधव, अनुसूचित जातीतील ५९ जातींचे नागरिक, सामाजिक संघटना, युवक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे आवाहन केले.
पत्रकार परिषदेला मोर्चा आयोजन समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.



