
त्रिपुरातील निवडणुकीत सत्ताधारी भाजपनं 334 जागांपैकी 112 जागा बिनविरोध जिंकल्या….
त्रिपुरा प्रतिनिधी : त्रिपुरातील निवडणुकीत सत्ताधारी भाजपनं (BJP) 334 जागांपैकी 112 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता, तर छाननीसाठी 5 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, विरोधी सीपीआय (एम), तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) चार, काँग्रेस आठ, एआयएफबीचे दोन आणि सात अपक्षांसह 36 उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज मागे घेतले. उर्वरित 222 जागांसाठी एकूण 785 उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
राज्यभरातील आगरतला महानगरपालिका (प्रभाग 51), 13 नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायतींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 334 जागा आहेत. यात अंबासा नगरपरिषद, जिरानिया नगरपंचायत, मोहनपूर नगरपरिषद, राणीबाजार नगरपरिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतीरबाजार नगरपरिषद या सात नगरपरिषदांमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवारच नाहीत, त्यामुळं भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.
माकपचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी आरोप केलाय, की भाजपच्या गुंडगिरीमुळं आमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले असून पाच नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींमध्ये आमच्या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही, असं त्यांनी सांगितलं. त्रिपुरामध्ये आपला पाया वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टीएमसीनं उत्तर-पूर्व राज्यात नागरी निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलंय. महापालिका निवडणुकीत एकूण 5,94,772 मतदार मतदानासाठी पात्र असून शहरी भागातील पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.



