
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
राज्य प्रतिनिधी जालना,) :- इयत्ता अकरावी व बारावी तसेच बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. तरी जालना शहरातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर दि. 30 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज करावेत, आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास दहावी, बारावी व बारावी नंतरच्या अभ्यासक्रमास किमान 50 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच अनु. जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. सदर विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे अपेक्षीत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रम अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टलवरून डाऊनलोड करुन त्यांची प्रिंट घेऊन देखील संबधित वसतिगृह किंवा सहायक आयुक्त कार्यालयास ऑफलाईनरित्या सादर करणे आवश्यक आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



