
केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा— खा. श्रीरंग बारणे,जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न
रायगड प्रतिनिधी- केंद्र शासनामार्फत लोककल्याणाच्या प्रभावी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना लाभार्थ्यांना 100 टक्के लाभ मिळेल यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे असे निर्देश खा. श्रीरंग बारणे यांनी दिले. केंद्र शासनाच्या योजना राबविताना जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या सर्व घटकावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना खा. सुनील तटकरे यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार श्री. श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज झाली. बैठकीला खा. धैर्यशील पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ.रविंद्र पाटील,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अप्पासाहेब निकत, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे,सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. लोकहिताची विकास कामे करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक सजग रहावे. सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यावर भर द्यावा. या योजनासंदर्भातील उदासीनता दूर करून प्रभावीपणे योजना राबवावी. जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांची तपासणी करावी, त्यांचा आढावा घेण्यात यावा तसेच पूर्ण झालेल्या योजनामध्ये पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे का याची खातरजमा करावी असेही श्री बारणे यांनी यावेळी सांगितले.



