जालना : प्रतिनिधी मराठवाडा जलसमृध्दी प्रतिष्ठाण, मसिआ व टीम ऑफ असोसिएशन यांच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह, मसिआ,छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील पाणी प्रश्न चर्चा व उपाय योजना यावर जलसंवादचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील पाण्याबद्दल प्रेम, आपुलकी व विकासाची भावना असणारे लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, पाणी वापरकर्ते, प्रसार माध्यमे व जलप्रेमी इत्यादींकरीता जलसंवाद आयोजित केलेला आहे. मराठवाडा विभागावर पाण्याविषयी सातत्याने होणारा अन्याय, पाणीटंचाई व पाणी तूट यावर उपाय योजना व भविष्यातील वाटचाल याविषयी सादरीकरण व चर्चा होणार आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपात ५८ टक्क्यांच्या निर्बंधांमुळे जायकवाडी धरणावर होणारा अन्याय, नदीजोड प्रकल्पात कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी, दुष्काळग्रस्त मराठवाड्यास १५५ टीएमसी पाणी मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करणे, धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यासाठी कृष्णाखोऱ्यातून ५१ टीएमसी पाणी स्थलांतरित करणे. हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यासाठी विदर्भातील वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प वाशिमपर्यंत वाढवून दुष्काळी मराठवाड्यासाठी येलदरी (१४ टीएमसी) आणि पैनगंगा (१८ टीएमसी) धरणात असे एकूण ३२ टीएमसी पाणी देण्याची कार्यवाही करणे, मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर करणे, सिंचन तज्ज्ञ शंकरराव नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली होणाऱ्या व मराठवाड्यातील पाणी व सिंचन चळवळीला गती व दिशा देणाऱ्या या ‘मराठवाडा पाणी प्रश्न व चर्चा ‘ कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय, उद्योग व्यापार, शेती सिंचन क्षेत्रातील कार्यरत पदाधिकारी, जाणकार, अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय लाखेपाटील यांच्यासह मराठवाडा जलसमृध्दी प्रतिष्ठाण, मसिआ व टीम ऑफ असोसिएशन यांनी केले आहे.