ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले
रायगड ( प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींच्या १८३० गावांमध्ये लवकरच केंद्रस्तरीय समितीमार्फत स्वच्छतेची तपासणी करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणामध्ये गाव पातळीवरील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला व सुका कचरा वेगळीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, खत खड्डे, प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.
तपासणीदरम्यान समितीकडून घरोघरी भेटी दिल्या जातील आणि नागरिकांच्या हात धुणे, शौचालयाचा नियमित वापर, कचरा व्यवस्थापनाच्या सवयींचा आढावा घेतला जाईल. यासोबतच शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठा, धार्मिक स्थळे व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता देखील तपासली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनी सर्वेक्षणामध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे
या सर्वेक्षणात गावांचे मूल्यांकन एकूण १००० गुणांच्या आधारे केले जाणार आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन – १२० गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद व मानसिकतेत झालेला बदल – १०० गु
स्वच्छता सुविधांचा वापर – २४० गुण, गावांची प्रत्यक्ष पाहणी व प्रश्नावली – ५४० गुण, मोबाईल अॅप व घरगुती सर्वेक्षणावर आधारित नागरिक अभिप्राय – प्रत्येकी ५० गुण, अशा विविध निकषांवर मूल्यमापन होणार आहे
“स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल” ही संकल्पना लक्षात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात दृश्यमान स्वच्छता टिकवण्यावर भर द्यावा, तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी व सार्वजनिक जागांची नियमित देखभाल करावी, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.