शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला कळमनुरी-वसमत उपविभागाचा आढावा
शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला कळमनुरी-वसमत उपविभागाचा आढावा..
राज्य प्रतिनिधी-शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघनाताई साकोरे- बोर्डीकर यांनी कळमनुरी व वसमत उपविभागाचा आढावा घेताना दिल्या.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गजानन घुगे, शशिकांत वडकुते, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे आदी उपस्थित होते. वसमत येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे- बोर्डीकर म्हणाल्या, महिला व बालविकास विभागामार्फत पीडित व गरजू महिला व बालकांसाठी बालसंगोपन योजना, सखी वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन 181, राष्ट्रीय पोषण अभियान यासह अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेची सर्वसामान्य लाभ मिळण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी.
आरोग्य विभागांनी क्षयरोगमुक्त अभियानांतर्गत तपासणीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणीचे प्रमाण वाढवावे. त्यांना योग्य तो औषधोपचार करावा. अवयवदान पंधरवाडा, संजीवनी अभियान, आयुष्यमान भारत योजना, डेंग्यू-मलेरिया अभियान यासारखे विविध उपक्रमांची जनजागृती करुन सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. ‘ड्राय डे अभियान’ राबवावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदाब व शूगरच्या गोळ्या मोफत वितरीत केल्या जातात. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला द्यावा. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करावी. तसेच अवैध गुटखा विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावेत, हद्दपारीची कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.
कळमनुरी उपविभागात सुरु असलेली रस्त्याची कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी. दर्जाहीन कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी. ऊर्जा विभागामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर पंप योजना, कुसूम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसह नवीन वीज उपकेंद्राचे प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावेत.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घरांना नळजोडणी झाली पाहिजे. त्याचबरोबर शाळा, अंगणवाड्यांनाही नळजोडणी द्यावी. जलजीवन योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. जलजीवन योजनेची कामे दर्जेदार करावीत. पाण्याचा स्त्रोत तपासून जलजीवन योजनेची विहिरी घेण्यात यावीत. जलजीवन योजनेच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेनी जलजीवन योजनेची कामे दर्जेदार व वेळेत करुन नागरिकांना पाण्याची सोय उपलबध करुन द्यावी. या कामात हयगय करणाऱ्या कंत्रादारावर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे. याबाबत यंत्रणेने हयगय केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे निर्देश राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.