नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ· सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…
नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ· सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…
मुंबई, प्रतिनिधी- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना निर्भेळ शुद्ध, स्वच्छ व उत्तम प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षितता अभियान” शुभारंभ अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आला. या अभियानांतर्गत अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.
सचिव धीरज कुमार म्हणाले की, सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता अन्न व्यावसायिकांनी घ्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून जनजागृती, प्रशिक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर शहरातही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. अन्न व्यवसायिकांनी आपल्यामध्ये असलेल्या कल्पना, विचार आहेत ते कृतीत आणावे. अन्न व औषध प्रशासन मंत्री व राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विभागाने पुढे येऊन काम करावे व अंमलबजावणीमध्ये अग्रस्थानी राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात अन्न तपासणी लॅबची संख्या वाढवत आहोत. विभागासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्राहकांना निर्भेळ शुद्ध ,स्वच्छ व चांगल्या प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व्यवसायिकांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे ते आत्मसात करून कृतीमध्ये आणावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दि. ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षितता अभियान” या अभियानातून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले