
महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या विमा भरपाई आणि बॅंकिंग सेवा पूर्ववत करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिले. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचे पत्र…
नवी दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या विमा भरपाई आणि बॅंकिंग सेवा पूर्ववत करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिले. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचे पत्र देऊन सरकारचे ऐक्य दर्शविण्याचा महाविकास आघाडीचा हा प्रयत्न मानला जात असला तरी अर्थमंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच खासदारांचा समावेश होता.
सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठविण्याची स्वतंत्र व्यवस्था असली तरी महाविकास आघाडीच्या खासदारांमार्फत हे पत्र पाठवून कोकण आणि अन्य भागातील पूरग्रस्तांची भावना केंद्राच्या कानावर घालण्याचा हा प्रयत्न होता. अर्थमंत्र्यांना भेटणाऱ्या १५ खासदारांच्या शिष्टमंडळात शिवसेनेचे संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, फौजिया खान यांचा समावेश होता. मात्र, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले एकमेव खासदार बाळू धानोरकर शिष्टमंडळात सहभागी नव्हते. खासदार धानोरकर आज दिल्लीमध्ये नसल्यामुळे अर्थमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात ते सहभागी होऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले. तर, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कुमार केतकर हे कॉंग्रेसचे राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे (राजीव सातव यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे) महाराष्ट्रातील खासदार आहेत. त्यांचाही या शिष्टमंडळात समावेश नव्हता.,



