जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवनदान..!- हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार
जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवनदान..!- हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार
सांगली, प्रतिनिधी) : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते. पण, वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील दोन व सांगली येथील एक अशा एकूण तीन रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशील व तत्पर समन्वयातून यकृत अवघ्या 25 मिनिटात कोल्हापूरला आणि तिथून विशेष विमानाने अवघ्या दीड तासात नाशिकला पोहोचले तर मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉरद्वारे रूग्णवाहिकेतून नाशिकला रवाना झाले.
सांगलीतील हरिपूर येथील रहिवासी, 69 वर्षीय दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये झालेल्या तीव्र रक्तस्त्रावामुळे मंगळवारी, दि. 16 डिसेंबर रोजी उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मेंदू मृत झाल्याचे स्पष्ट झाले. अशा दुःखद क्षणीही त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या दुःखावेगाला आवर घालत अवयवदानाचा घेतलेला निर्णय मानवतेला उंचावणारा ठरला. पत्नी दीपा, कन्या डॉ. श्रेया आणि चिरंजीव अभिनंदन धर्माधिकारी यांनी इतर कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय घेत, दीपक धर्माधिकारी यांना मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला. त्यानुसार दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, दोन डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. या निर्णयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांना रूग्णालय प्रशासनाने दिली.
यासंदर्भात दीपक धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मानवता एक आहे, आपल्यात कसलाही भेद नाही, अवयवदानाने आपल्या व्यक्तिंना अजरामर करावे. मृत्युनंतरही मृत व्यक्ति कुठल्या तरी व्यक्तिमध्ये अवयवाच्या रूपाने जिवंत राहणार आहे आणि त्याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभणार आहेत, असे सांगून त्यांनी दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, दोन डोळे आणि त्वचा या अवयवांचे दान करण्याचा निर्णय अवयवदानाच्या चळवळीला बळ देणारा आहे. यामुळे अवयवदानाबद्दल समाजात अधिक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे आयुष्य जरी संपले असले तरी त्यांच्या अवयवदानामुळे दोन जीवांना नवे आयुष्य लाभले. ही घटना समाजाला मानवतेचा खरा अर्थ शिकवणारी ठरली