शिवनगर येथील झोपडपट्टीमधील घरे पाडू नका; रिपब्लीनक पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन
जालना प्रतिनिधी- शहरातील शिवनगर येथील झोपडपट्टीमधील घरे ही 1995 पासून अस्तित्वात आहेत. परंतु, रस्त्याच्या कामामुळे या भागातील नागरीकांच्या घरावर मार्कींग करण्यात आले. त्यामुळे शिवनगर येथील झोपडपट्टीतील कोणतीही घरे पाडण्यात येऊ नये अशी मागणी या भागातील नागरीकांनी आयुक्ताकडे बुधवार दि. 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता केली आहे.
शिवनगर येथील झोपडपट्टीमधून जिल्हा समान्य रुग्णालय ते राष्ट्रमाता कॉलेजकडे जाणारा रस्ता तयार करण्यात येत आहे. परंतु, या भागातून जाणार्या जुन्या रस्त्यावरुन रस्ता तयार न करता लोकांची घरे पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची घरे पाडली जाणार आहेत. त्यामुळे लोकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. सदरील गोरगरिबांची घरे पाडू नये यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे महाराष्ट्र संघटक सचिव अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी पुढाकार घेत झोपडपट्टी धारकांची भेट घेतली. दरम्यान झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या पाडू नयेत यासाठी अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेतली. या शिष्टमंडळात गणेश सेठ रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, रावसाहेब रत्नपाखे, पांडूरंग हिवाळे, अशोक रत्नपारखे, अनिल बनकर, गौतम शेवाळे, सायबा गुढे, दैवताबाई वानखेडे, लिलाबाई रत्नपारखे, शोभाबाई भिसे, वंदना हिवाळे, सविता हिवाळे यांच्यासह महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शिवनगर येथील झोपडपट्टीमध्ये सुमारे 150 ते 200 घरे असून ते 1995 पासून राहतात. त्यांनी पुर्वीच्या नगरपालिकेला आणि आत्ताच्या महानगरपालिकेला नियमित टॅक्स भरला असून ते आजही भरीत आहेत. या ठिकाणी नागरी सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. असे असतांनाही झोपडपट्टीमधील कुटुंबांना बेघर करुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली जात आहे. हा प्रकार मानवी हक्काविरोधी असून अन्न, वस्त्र, निवारा या शाससनाच्या धोरणा विरोधात आहे. त्यामुळे या ठिकणी घरे न पाडता त्यांना सुविधा देत संरक्षीत करण्यात यावे अशी मागणी अॅड्र. ब्रम्हानंद चव्हाण यांनी केलीय.