श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ
अहिल्यानगर, प्रतिनिधी – श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त सामाजिक एकात्मता, सेवाभाव व निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी येथील भाई दया सिंह जी गुरुद्वारा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचा रविवारी संध्याकाळी यशस्वीरीत्या समारोप झाला. अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच भाई दया सिंह जी गुरुद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरास अहिल्यानगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, दिवसभरात एकूण १ हजार १०३ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
सकाळी या शिबिराचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला व “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असल्याचा संदेश दिला.
दिवसभरात या शिबिरास अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली व प्रशासकीय तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने आमदार संग्राम जगताप, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती भारती सागरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार वलांडे यांचा समावेश होता. याप्रसंगी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी यांच्यासह सर्व पदाधिकारी व वैद्यकीय पथक दिवसभर उपस्थित होते.
या शिबिरात फिजिशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व दंततज्ज्ञ आदींच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये ५१० नागरिकांची असंचारी रोग (NCD) तपासणी, ४५० जणांची प्रयोगशाळा तपासणी, २४२ बालकांची आरोग्य तपासणी, १२२ रुग्णांची अस्थिरोग तपासणी, १०० जणांची क्षयरोग तपासणी व छातीचा एक्स-रे, ८९ जणांची दंत तपासणी तर ८८ जणांची त्वचारोग तपासणी करण्यात आली. तसेच, या उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात १५३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.
आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिराच्या ठिकाणी विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला होता. याअंतर्गत १५३ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्डसाठी, ८४ नागरिकांची आभा कार्डसाठी, तर ८३ नागरिकांची शिधापत्रिकेसाठी नोंदणी करून त्यांना या सुविधांचा लाभ देण्यात आला.
प्रशासनाच्या विविध आरोग्य योजना व मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात हे शिबिर यशस्वी ठरले, अशी भावना उपस्थित मान्यवर व संयोजकांनी व्यक्त केली.