
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे; उद्या रेल्वे रोको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी :गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मागील तीन महिन्यांपासून रेल्वे, एसटीचे आरक्षण केले होते. त्यानंतर गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असताना चाकरमान्यांना प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहिर केली जाते. यात कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या प्रशासनाच्या नियमावलीचा चाकरमान्यांनी निषेध केला आहे. आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे, अशी मागणी कोकणवासियांकडून केली जात आहे. परिणामी, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने नवीन नियमावली रद्द करून कोकणात प्रवेश देण्यात यावा. यासाठी 6 सप्टेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याची भूमिका संघटनेच्यावतीने मांडली आहे.
मागील वर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात चाकरमान्यांना जाता आले नाही. त्यामुळे यंदा कोकणात जाण्यासाठी लगबगीने चाकरमान्यांनी तयारी केली होती. त्यासाठी तीन महिन्याच्या अगोदर रेल्वे, एसटीचे तिकिट काढले होते. मात्र, गणेशोत्सव तोंडावर असताना राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्यांसाठी नवीन नियम घातले आहे. सरकारने रेल्वे, एसटीचे आरक्षण करण्याच्यावेळी कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम घालणे आवश्यक होते. आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना नवीन नियम घातल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे. यासाठी 6 सप्टेंबरला रेल्वे रोको आंदोलन करणार आहोत, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी सांगितले.



