हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र हे पानझडी जंगल (Deciduous Forest) स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे येथे हिवाळयाच्या कालावधीत काही झाडांची पानगळती होऊन त्या झाडांना कालांतराने नवी पालवी फुटत असते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात निरनिराळया जातीची वृक्षसंपदा मोठया प्रमाणात आहे. त्यामधील काही झाडांची पानगळती विशिष्ट ऋतूनुसार होताना दिसून येते. या पानगळतीबाबत पर्यावरणप्रेमी, समाजसेवक, पत्रकार, वृक्षप्रेमी, नागरिक यांच्याकडून विविध माध्यमांतून चिंता व्यक्त होताना दिसून येते.
वास्तविकत: हिवाळयात झाडांची पाने गळणे ही अत्यंत नैसर्गिक आणि महत्वाची प्रक्रिया आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. याला शास्त्रीय भाषेत पर्णपात (Abscission) असे म्हणतात. हिवाळयात झाडांमध्ये ऐबासीसिक ॲसिड नावाचे संप्रेरक तयार होते. यामुळे फांदी आणि पानांच्या देठांमध्ये एक पातळ स्तराची भिंत तयार होते. या स्तरामुळे पानाला मिळणारे पाणी आणि पोषक तत्त्वे थांबतात आणि पाने सुकून खाली पडतात. मात्र काही कालावधीनंतर या झाडांना नवी पालवी फुटते.
नवी मुंबई महानगरपालिका उदयान विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वृक्षांची वेळोवेळी योग्य ती निगा राखली जाते. ऋतुमानानुसार निसर्गत:च होणारे बदल समजून घेऊन निसर्गाच्या विविध बदलांचे स्वागत करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.