
मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर
राज्य प्रतिनिधी’ मेळघाटातील दुर्गम व आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” अभियान राबविण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नियोजनातून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.याच अनुषंगाने शनिवार, ७ मार्च रोजी धारणी तहसील कार्यालयांतर्गत धुळघाट रोड परिसरात महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत शासनाच्या योजनांचा लाभ घेतला.
प्राप्त माहितीनुसार या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, विद्युत वितरण कंपनी तसेच इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेत नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन व निराकरण करण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमात बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी सांगितले की, मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे म्हणजेच “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होणे होय.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडविणे, विविध योजनांचा लाभ देणे तसेच तक्रारींचे त्वरित निवारण करणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांना देण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच इतर आवश्यक शासकीय दाखले वितरित करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या न मारता शासनाच्या सेवांचा लाभ थेट शिबिरातून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
धुळघाटरोड येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच सुपीत मालवीय व रोहीत पाल उपस्थित होते. प्रशासनाकडून सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसीलदार राजेश माळी, गटविकास अधिकारी शिडाम, तालुका कृषी अधिकारी जाधव, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असून अशा शिबिरांमुळे दुर्गम मेळघाटातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
00000



