vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

उष्माघाताचा वाढता धोका : खबरदारी घेतली तर संकट टळेल..

उष्माघाताचा वाढता धोका : खबरदारी घेतली तर संकट टळेल..

आरोग्य प्रतिनिधी-

राज्यात एप्रिल-मे महिन्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून अनेक भागांत तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण, अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ, थकवा यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

उष्माघात हा केवळ उन्हामुळे होणारा त्रास नसून तो गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रकार ठरू शकतो. शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि शरीराला स्वतःला थंड ठेवणे शक्य होत नाही, तेव्हा उष्माघात होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास बेशुद्धावस्था, अवयव निकामी होणे आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो

उष्माघाताची लक्षणे ओळखा :- उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक सामान्य थकवा समजून दुर्लक्ष करतात. खालील लक्षणे आढळल्यास त्वरित सावध व्हावे: तीव्र तहान लागणे,जास्त घाम येणे किंवा घाम बंद होणे,डोके गरगरणे अशक्तपणा आणि थकवा,उलटी किंवा मळमळ, त्वचा लालसर व गरम होणे,चक्कर येणे,गोंधळ, बेचैनी,बेशुद्ध पडणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ थंड जागी नेऊन वैद्यकीय मदत घ्यावी.

सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे?पुरेसे पाणी प्या,उन्हाळ्यात शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे तहान लागली नसली तरी वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, नारळपाणी, फळांचे रस यांचा उपयोग करावा. पाण्याने समृद्ध फळांचा आहार घ्या.टरबूज, खरबूज, द्राक्षे, संत्री, काकडी, अननस, टोमॅटो, कोशिंबीर यांसारखी फळे व भाज्या खाव्यात. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहते

योग्य कपडे परिधान करा,पातळ, सैल, सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत. काळ्या किंवा जाड कपड्यांमुळे उष्णता जास्त जाणवते. बाहेर पडताना टोपी, स्कार्फ, छत्री, गॉगल वापरावा.घर थंड ठेवा, दिवसा उन्हाच्या बाजूच्या खिडक्या, पडदे बंद ठेवावेत. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. शक्य असल्यास घरातील खालच्या मजल्यावर राहावे

काय करू नये?दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर पडणे टाळावे.अनावश्यक प्रवास टाळावा.अति व्यायाम किंवा श्रमाची कामे करू नयेत.चहा, कॉफी, मद्य, कोल्ड ड्रिंक्स जास्त प्रमाणात घेऊ नयेत.शिळे अन्न टाळावे.अनवाणी बाहेर जाऊ नये. बंद वाहनात मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत

कोणाला अधिक धोका?काही व्यक्तींना उष्णतेचा जास्त धोका असतो. त्यांची विशेष काळजी घ्यावी.लहान मुले व बालके,वृद्ध नागरिक,गर्भवती महिला,शारीरिक श्रम करणारे कामगार,हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण,मानसिक आजार असलेले व्यक्तीअशा व्यक्तींना वारंवार पाणी द्यावे, सावलीत ठेवावे आणि आरोग्याची नियमित चौकशी करावी

कामगारांसाठी विशेष सूचना बांधकाम, शेती, रस्ते कामे, कारखाने, वाहतूक क्षेत्रातील कामगार दिवसभर उन्हात काम करत असल्याने त्यांना मोठा धोका असतो.कामाच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची सूचना द्यावी.सावलीत विश्रांतीची व्यवस्था करावी.सकाळी व संध्याकाळी कामाचे नियोजन करावे.जड कामात विश्रांतीची वेळ वाढवावी.उष्माघाताची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्यावे.

उष्माघात झाल्यास प्रथमोपचार कोणाला उष्माघाताचा त्रास होत असल्यास:व्यक्तीला त्वरित सावलीत किंवा थंड जागी आणा.घट्ट कपडे सैल करा.थंड पाण्याने अंग पुसा.पंखा लावा किंवा हवा द्या.व्यक्ती शुद्धीत असल्यास पाणी द्या.त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.सामूहिक कार्यक्रमांमध्येही काळजी आवश्यक: मेळावे, यात्रा, क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा किंवा गर्दीच्या कार्यक्रमांत उष्णतेचा धोका वाढतो. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी, सावली, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्था असणे आवश्यक आहे.

ष्माघात हा टाळता येण्याजोगा धोका आहे. वेळेवर पाणी पिणे, सावलीत राहणे, योग्य कपडे वापरणे आणि दुपारच्या उन्हापासून दूर राहणे या साध्या उपायांनी गंभीर परिणाम टाळता येतात. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. “उन्हापासून बचाव करा, पाणी प्या आणि सुरक्षित रहा.”

0000

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट*

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना- ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरच्या पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा