
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्य प्रतिनिधी-सौर ऊर्जेतून शाश्वत भविष्य घडवण्याकडे महाराष्ट्राची वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन करण्यात आले. दावोस येथे वारी ग्रुपसमवेत झालेल्या सामंजस्य करारानंतर विक्रमी वेळेत नागपूर येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छ ऊर्जा हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून भारत या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून त्यातील अनेक उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य केली आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक हरित ऊर्जा संक्रमणाला गती मिळत आहे. त्यातूनच आज ऊर्जा संक्रमण आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारत जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक ठरत असून विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारत ऊर्जा संक्रमणात जगात सर्वात पुढे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र शासनाने ऊर्जा परिवर्तन हाती घेतले आहे. याअंतर्गत सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना लागणारी सुमारे 16,000 मेगावॅट वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून जगातील सर्वात मोठ्या डिस्ट्रिब्युटेड सोलर प्रकल्पांपैकी एक असा ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ प्रकल्प सुरू केला आहे. त्या माध्यमातून 5000 मेगावॅट वीज निर्मिती होत असून, वर्षाखेरीस ही क्षमता 14,000 मेगावॅटपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.



