
महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान; नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती
मुंबई प्रतिनिधी : महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
फॉर्च्युन इंडिया’ मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या ‘फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वुमेन (सर्वाधिक प्रभावी महिला)’ पुरस्काराचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जुलै रोजी मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
विविध क्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या महिलांना संबोधित करताना, राज्यपाल म्हणाले की, महिला स्वयंसहायता गटांमुळे स्वतःच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून इतरांना देखील प्रोत्साहन देणाऱ्या महिला अनेक ठिकाणी उदयास आल्या आहेत.
पूर्वी बँकेत जाण्यासदेखील घाबरणाऱ्या त्रिपुरा येथील एका ग्रामीण महिलेने कालांतराने स्वतः अधिकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाने पॉवर पॉईंट सादरीकरण केले त्यावेळी सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले होते. ती महिला ‘बँक सखी’ म्हणून आज अनेक महिलांना मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांकडील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. महिलांकडे गेलेला पैसे सुरक्षित असतो, असे त्यांनी सांगितले.



