
शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा
रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:- डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठातर्फे येत्या 18 मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित शानदार कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील एका नाविन्यपूर्ण शेतकऱ्यास शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याचे कुलगुरु डॉ. संजय भावे यानी जाहीर केले असून त्यासाठी पात्र शेतकन्यांनी विद्यापीठाच्या संबंधित संशोधन केंद्र किंवा कृषि विज्ञान केंद्र किंवा संचालक, विस्तार शिक्षण यांच्या कार्यालयाकडे सहभाग नोंदवावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ.राजेश ठोकळ यांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेत प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाद्वारे येत्या 18 मे रोजी निवड झालेल्या शेतकऱ्याचा भव्य समारोहात सत्कार करण्यात येणार आहे.
जे शेतकरी वैज्ञानिक पध्दतीने शेतीचे व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, विद्यापीठ शिफारसींचा अवलंब, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ज्ञान प्रसाराच्या माध्यमातून कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात लक्षणीय योगदान देतात, त्या शेतकऱ्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल इच्छुक शेतकऱ्यांनी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेबसाईटवर (dbskkv.org) उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील फॉर्म डाऊनलोड करुन आवश्यक माहिती भरावी पात्र शेतकऱ्यांनी आपले जीवनवृत्त (बायोडेटा) नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माहिती आणि पुराव्यासह संबंधित जिल्ह्याच्या कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक यांच्याकडे किंवा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग आणि रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत जि.रायगड किंवा दोन्ही विभागातील पात्र शेतकऱ्यांनी संचालक विस्तार शिक्षण, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. त्नागिरी याच्या कार्यालयाकडे दि.13 एप्रिल 2026 पर्यंत हार्ड कॉपीद्वारे पाठवावी. स्पर्धक शेतकऱ्यांकडून बायोडेटा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कार्याची पाहणी एका समितीद्वारे होईल व सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांची निवड शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी करण्यात येईल, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.
००००००



