जिल्हा नियोजनचा निधी 25 मार्चपूर्वी खर्च करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, प्रतिनिधी: जिल्हा नियोजन व विकास समितीमधील संपूर्ण निधीचे वितरण करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असलेल्या सर्व मान्यता देण्यात आल्या आहे. त्यामुळे यंत्रणांनी 25 मार्चपूर्वी निधी खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजनच्या खर्चाबाबत अंतिम बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावर्षीच्या जिल्हा वार्षिकच्या निधीमधून एकही रूपया परत करू नये. व्यपगत होणारा निधी तातडीने जिल्हा नियोजनला कळविण्यात यावा. तसेच हा निधी परत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच यंत्रणांना निधीची आवश्यकता असल्यास त्याची माहिती सर्व मान्यतासह सादर करण्यात यावी. या कामांच्या गरजेनुसार निधी देण्यात येईल. जिल्हा वार्षिकच्या जिल्ह्यातील कामांना 25 मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे खर्चाबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
यंत्रणांनी कामे पूर्ण केली असल्यास देयके तातडीने कोषागारामधून आहरित करण्यात यावी. तसेच आभासी वैयक्तिक ठेव लेखा या यंत्रणेचा उपयोग करण्यात यावा. या यंत्रणेचा उपयोगाने निधी एक वर्षापर्यंत उपयोगात आणू शकता येणार आहे. या सेवेच्या माहिती करून द्यावी, जिल्ह्यातील यंत्रणांच्या सहकार्य करण्यासाठी कोषागार कार्यालयाने मदत करावी. त्यामुळे यंत्रणांनी वेळेवर निधी समर्पित करू नये, असे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी जिल्हा नियोजनचा निधी व्यपगत होऊ नये, यासाठी तातडीने निधी आहरित करण्यात यावा, असे सांगितले. जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी व्हीपीडीए पद्धतीची माहिती दिली. याबाबत माहिती आणि मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याचे सांगितले.