
विधानसभा लक्षवेधी-
मुंबई, प्रतिनिधी: धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील 132 केव्ही वीज केंद्र प्रकल्पाचे काम 2027 पूर्वी पूर्ण करून उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर विजेच्या पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
सदस्य मंजुळा गावित यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.याबाबत अधिक माहिती देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपळनेर प्रकल्पाला 22 जुलै 2024 रोजी प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 20 मार्च 2025 रोजी एमएआरसीकडून मंजुरी मिळाली. प्रकल्पासाठी कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला असून, नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत
या प्रकल्पामुळे परिसरातील वारंवार होणारे ट्रिपिंग, व्होल्टेज फ्लक्चुएशन आणि लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. राज्यात सध्या वीज उपलब्धतेची कमतरता नसून, तांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात. पिंपळनेर येथे उभारण्यात येणारे हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर अशा समस्या उद्भवणार नाहीत. संबंधित मतदारसंघातील वीज समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पुढील सात दिवसांत महावितरण आणि महापारेषणचे अधीक्षक अभियंता यांची संयुक्त बैठक घेऊन स्थानिक प्रश्न निकाली काढले जातील, असेही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
०००
धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण हटवणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, : धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर राज्य शासन गंभीर असून पूरस्थिती टाळण्यासाठी नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या प्रकारासंदर्भात सदस्य अनुपभैय्या अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, धुळे शहरात नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे या अतिक्रमणांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संदर्भात एप्रिल महिन्यात विशेष बैठक घेण्यात येईल. तसेच या प्रकरणाची जबाबदारी मंत्रालयातून उपजिल्हाधिकारी (निवासी) यांच्याकडे सोपविण्यात येणार असून उच्च न्यायालयातील प्रकरणासाठी विशेष वकील नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या न्यायालयाने दिलेला ‘स्टेटस को’ आदेश मागे घेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे. ज्या ठिकाणी न्यायालयाचा ‘स्टेटस को’ लागू नाही, त्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे आणि पूरस्थिती टाळणे ही शासनाची जबाबदारी असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. अशा कुटुंबांना शक्य असल्यास पर्यायी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे असून त्यावर मंत्रिमंडळात विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाल्यांवरील काही धार्मिक बांधकामेही अतिक्रमण करून उभारली असतील तर तीही नियमांनुसार हटवण्याची कारवाई केली जाईल. शासकीय जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण मान्य केले जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
००००
गेटवे ऑफ इंडिया येथे अधिक चांगल्या सुविधा देण्याची योजना – मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे



