अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे याव-सभापती प्रा.राम शिंदे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे-पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे याव-सभापती प्रा.राम शिंदे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे-पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर, प्रतिनिधी: आजचा तरुण हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त करून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी केले.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जनजागृतीला चालना दिली जात असल्याचे सांगितले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन करत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने राबविलेल्या या जनजागृती अभियानाचे त्यांनी कौतुक केले.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. ‘ एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य ‘ व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरात व्यसनमुक्त रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती प्रा शिंदे म्हणाले की, तरुणांची ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व हे राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. मात्र अंमली पदार्थ आणि व्यसनांच्या वाढत्या विळख्यामुळे अनेक तरुणांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि कुटुंबीयांचे सुख धोक्यात येत आहे.अहिल्यानगरचे भविष्य उज्ज्वल राहिले तरच राज्याचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. तरुणांनी देखील या अभियानाचा भाग होऊन चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे. तरुणांनी व्यसनाच्या नाही तर स्वप्नांना होकार देण्याचे आवाहन विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी यावेळी केले.
पालकमंत्री डॉ विखे पाटील म्हणाले की, अंमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीचे आरोग्य बिघडवत नाही, तर त्याच्या कुटुंबावर, समाजावर आणि देशाच्या प्रगतीवरही विपरीत परिणाम करते. व्यसनामुळे मानसिक ताण, आर्थिक नुकसान, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक विघटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, कला, उद्योग आणि समाजसेवा यांसारख्या सकारात्मक क्षेत्रांमध्ये स्वतःला घडविण्याचा निर्धार करणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे या अभियानाचे खूप चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामुळे नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती निर्माण होणार आहे. तरुणांनी देखील व्यसनाकडे न वळता भविष्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.
आमदार श्री दाते म्हणाले की, व्यसन हे आपल्या समाजाला लागलेली किड आहे. आपल्या देशातील तरुणांनी व्यसनाकडे वळू नये. आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने तरुणांनी मार्गक्रमण करावे. तरुणांनी व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन म्हणाले की, व्यसनमुक्त समाजासाठी आजच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरुण आपल्या देशाचे भविष्य आहे. आपले भविष्य नशामुक्त राहणे गरजेचे आहे. ‘ नशामुक्त भारताचे’ स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे असेही ते म्हणाले. तरुणांनी समाज माध्यमाचा उपयोग केवळ आपल्या विकासासाठी करावा. समाज माध्यम हाताळताना देखील खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.या अभियानांतर्गत शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.