
अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी जलद कार्यवाही करावी ! मंत्री आदिती तटकरे
राज्य प्रतिनिधी-रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, दुकाने, शेती व पशुधनाच्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबद मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. रायगड जिल्ह्यातील नागोठणे व रोहा परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुकानदारांना नुकसानभरपाई तातडीने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
विभागीय स्तरावरील प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत नागोठणे व रोहा परिसरातील नुकसानग्रस्त दुकानांसाठी ३ कोटी ५३ लाख ५० हजार रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा अशा सूचना रायगड जिल्हा प्रशासनास दिल्या. नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही सूचना दिल्या. दुकानांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, संबंधित प्रस्तावासोबत आवश्यक प्राधिकृत प्रमाणपत्र (Accreditation/प्रमाणित पत्र) जोडून प्रकरणे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंनाही शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक पात्र भाडेकरूला ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आतापर्यंत १,७३७ लाभार्थींना मदत वितरित करण्यात आली आहे. उर्वरित १५१ भाडेकरूंनी आवश्यक कागदपत्रे सादर करताच त्यांनाही तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात येईल. शेती, पशुधन, घरे आणि व्यावसायिक आस्थापनांच्या नुकसानीची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढून आपत्तीग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देशही दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, कार्यकारी अभियंता सहभागी होते.
0000
0



