महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत…
राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने गावांना पुराचा वेढा बसला असून, काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचीही माहिती आहे.
या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ पूरग्रस्त भागांचा दौरा सुरू केला आहे. मुख्यमंत्री सोलापूरमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांची पाहणी केली. त्यांनी करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली. ‘नुकसान मोठं असून पंचनाम्याला वेळ लागेल,’ असे अजित पवारांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्याची पाहणी करणार आहेत.