मी कुठल्याही बाबाकडे जात नाही तरीही मला मंत्रीपद मिळते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
राज्य प्रतिनिधी – नाशिकचे खरात, त्याच्या चुकीमुळे गेले आहेत जेलच्या दारात, अशा ओळी सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी खरात प्रकरणावर भाष्य केले. माझा कुठल्याही बाबावर विश्वास नाही, कुठल्याही बाबाकडे मी जात नाही. तरीही मला माझे पद, मंत्रीपद मिळत आहे. कोणीही भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खरातबरोबर अनेकांची नावे जोडली गेली असली, त्याच्याबरोबरचे फोटो असले, त्याच्या गैरप्रकाराशी त्यांचा संबंध असेल असे नाही. त्यामुळे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिकाही ना. रामदास आठवले यांनी मांडली.
रिपब्लिकन पक्षाची कार्यकारणी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर ना. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सत्याग्रह केला होता. त्या घटनेचे शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे. सामाजिक समता परिषद आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी नेते, विचारवंत यांना बोलवण्यात येणार आहे. जाती व्यवस्था बदलली पाहिजे. त्यासाठी अनेक शहरात परिषद होणार आहे. तसेच समता परिवर्तन यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरला सातारा येथून ही यात्रा सुरू करून त्याचा समारोप पुण्यात होईल. वेगवेगळे जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी यात्रा जाणार आहे, असे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
आमचे उपमहापौर यांच्यावर अन्याय होता कामा नये. महत्त्वाच्या बैठकीला आमच्या उपमहापौर यांना बोलावले पाहिजे. या बाबत केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्याशी या बाबत चर्चा केली जाईल. कोणताही वाद राहू नये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर हा विषय घातला जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही ना. रामदास आठवले यांनी नमूद केले.