जालना, प्रतिनिधी:- गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर या नावाजलेल्या शिक्षण संस्थेने सन 2025-26 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यावर्षी सुध्दा 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून, सर्व विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करून शाळेच्या आणि पालकांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत शाळेच्या गुणवत्तेची पातळी उंचावली आहे. विद्यालयातील पहिले तीन क्रमांक प्रथम क्रमांक कु. सूर्या राकेश गुप्ता (97.80 टक्के), द्वितीय कु. श्रेयसी शंकरराव काळे (96.40 टक्के), तर तृतीय चि. क्षितिज सुधाकर जाधव (95.60 टक्के) या प्रमाणे आहेत.
विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अंगीकारलेली शिस्त, घेतलेले अपार परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावरच हे यश साध्य झाले आहे. हे यश त्यांच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीस निश्चितच दिशा देणारे ठरेल.
या अभूतपूर्व यशाबद्दल पीटीसी सदस्य, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.