
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानशासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण
अकोला, प्रतिनिधी: राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांर्तगत शासकीय कर्मचारी या गटात गव्हर्नमेंट ॲसेट मॅपिंगकरिता प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलसेवक ऋषिकेश आंग्रे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज प्रदान करण्यात आला.
नागरी सेवा दिन 2026 आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26’ अंतर्गत पारितोषिक वितरण सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनातर्फे ई-भूमिती हा एक अभिनव जीआयएस-आधारित डिजिटल उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्याच्या निर्मिती व अंमलबजावणीत श्री. आंग्रे यांनी योगदान दिले आहे.
हा प्रकल्प “मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्मेंट” या संकल्पनेवर आधारित आहे. या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील ३ हजार ४६६ शासकीय जमीन ज्याचे एकूण क्षेत्रफळ 17 हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, रेशन दुकाने, रुग्णालये, डिजिटल सेवा केंद्रे व जलस्रोत यांची भौगोलिक नोंद व नकाशांकन करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाला अचूक, पारदर्शक व जलद निर्णय घेणे सुलभ झाले आहे. तसेच नागरिकांना शासकीय माहिती सहज उपलब्ध होत असून सार्वजनिक संसाधनांचे संरक्षण, नियोजन व प्रभावी वापर सुनिश्चित होत आहे.
०००



