
टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
तामिळनाडू प्रतिनिधी-तमिळनाडूमधला सत्तास्थापनेचा पेच संपुष्टात, आवश्यक संख्याबळ प्राप्त झाल्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी घेतली शपथ.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच, सी. जोसेफ विजय यांनी अधिकृत कागदपत्रांच्या पहिल्या संचावर स्वाक्षरी केली.
अभिनेता जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित होते. विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र मोदी म्हणाले की, विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विजय यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा आहेत. लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत काम करत राहील, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
अखेर पाच दिवसाची प्रतीक्षा संपली
जोसेफ विजयने सीएमओ कार्यालयात जाऊन पदभारही स्वीकारला तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या. मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ आले होते. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले. काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली. तरीही दोन आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्तास्थापनेचा पेच सुटला नव्हता. अखेर व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि सत्तास्थापनेचा तिढा सुटला.
चेन्नई येथील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच, विजय यांनी तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली. या स्वाक्षऱ्यांद्वारे, घरगुती ग्राहकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवण्यास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित एका विशेष दलाची स्थापना करण्यास विजय यांनी मंजुरी दिली



