शासकीय आश्रमशाळा पेंढरघोळ येथे ‘शालेय प्रवेशोत्सव’ उत्साहात चिमुकल्यांचे सजवलेल्या कारमधून आगमन
ठाणे, प्रतिनिधी- शहापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेंढरघोळ येथे १५ जून २०२६ रोजी ‘शालेय प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या कारमध्ये बसवून वाजतगाजत शाळेत आणण्यात आले. लेझीमच्या तालावर आणि पारंपारिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर, नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून, त्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. स्वागत गीत आणि वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी पेंढरघोळचे प्रतिष्ठित नागरिक खंडूशेठ बरोरा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए. आर. जाधव, कनिष्ठ विकास अधिकारी (ठाणे) शरद लोणारी आणि वरिष्ठ लिपीक (ठाणे) उदय भोईर हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके, दप्तर, बूट, गणवेश आणि अंथरूण-पांघरूण या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच, इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि फोल्डर देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे शालेय प्रवेशानिमित्तचे ऑनलाईन मार्गदर्शन उपस्थित सर्वांना ऐकवण्यात आले. सोबतच, नाशिक आयुक्तालय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या वार्षिक नियोजन आराखड्याचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावर्षी शाळेत एक कौतुकास्पद व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षरोपण करून घेण्यात आले. या रोपट्यांवर संबंधित विद्यार्थ्याचे नाव लिहून, इयत्ता दहावीपर्यंत या झाडाची जोपासना करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मुख्याध्यापक श्रीम. एस. बी. मोहिते व सर्व कर्मचारी वृंदांच्या उत्तम नियोजनामुळे शालेय परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुसज्ज दिसत होता. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शालेय सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला, विद्यार्थ्यांना वर्गात बसवून त्यांची हजेरी घेण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आणि आभार मानत या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.