राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही;वर्षभरात १५ लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, प्रतिनिधी- राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. घरकुल योजनेच्या निधीबाबत कोणतीही कमतरता नसून लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, अशी ग्वाही देत राज्यात पुढील एक वर्षात १५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य समीर कुणावर यांनी विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी सर्वश्री सदस्य निलेश राणे, राहुल पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री गोरे म्हणाले की, मागील वर्षी राज्याला २९ लाखावर घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी २८.१७ लाख लाभार्थी निश्चित करून २७ लाख ८५ हजार ७२४ घरांना मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत २६ लाखावर घरांना पहिला, १७ लाखावरघरांना दुसरा आणि ११ लाखावर घरांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे; तसेच आजपर्यंत ६ लाख ५ हजार ५९६ घरे पूर्ण झाली असून एका वर्षात ६ लाख घरे पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
घरकुलाच्या निधीबाबत माहिती देताना ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, सन २०२५-२६ मध्ये ५ हजार २९० कोटी रुपये, तर २०२६-२७ मध्ये १३ हजार ९४७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या स्पर्श या ऑनलाइन निधी वितरण प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने हप्ते देण्यास विलंब झाला; मात्र आता ही प्रक्रिया सुरळीत सुरू असून कोणत्याही घरकुल लाभार्थ्याचे पैसे थांबणार नाहीत
घरकुलासाठी आवश्यक जमिनीच्या उपलब्धतेबाबतही शासन सकारात्मक आहे. जमीन उपलब्ध नसल्यास प्रति लाभार्थी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम जागा खरेदीसाठी देण्यात येत असल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले