संत एकनाथ महाराज पालखी सोहळा:-वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी येत्या ७ जुलै रोजी पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूर कडे होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षितता ,आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. संभाजी अडकुणे यांनी दिले .
पैठण येथील नाथ मंदिर परिसरातील सभागृहात पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पैठण-फुलंब्री विभागाच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती अंभोरे , जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका लांडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. बी. ढोले तालुका वैद्यकीय अधिकारी पी एम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक श्री शेडगे, जलसंधारण, महावितरणचे अधिकारी, संत एकनाथ महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्री. बाजीराव बारे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालखी मार्गावरील विविध ठिकाणी सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर बीड, धाराशिव मार्गे पंढरपूर कडे वारकरी पायी जातात.यात वारकरी मोठ्या संख्येने पायी प्रवास करीत असल्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी सोहळा
सुरळीत पार पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाने ‘नोडल अधिकारी’ नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापकांना त्वरित उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येईल. पालखीसोबत वैद्यकीय पथक, आवश्यक औषधे आणि इंजेक्शनचा साठा उपलब्ध ठेव्यात यावा असे निर्देश देण्यात आले.वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाणार असून, महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्नानगृहांची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासह, महावितरण विभागाला दिंडीच्या ज्या ठिकाणी मुक्काम असणार त्या गावातील भार नियमन त्या रात्री न ठेवता वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले
पालखी सोहळ्यातील स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस आणि डिझेलच्या पुरवठ्यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी असे निर्देश पुरवठा विभागास देण्यात आले.पावसाळ्याचा विचार करता मार्गावर वॉटरप्रूफ मंडपांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागाने समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे यांनी दिले.