vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी…

 

पालघर प्रतिनिधी: राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन–विरार सागरी सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करून संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्गत रस्त्यांचे जाळे, वन मंजुरी, वीजपुरवठा, रेल्वे कनेक्टिव्हिटी, भूसंपादन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास तसेच मच्छिमारांच्या नुकसानभरपाई संदर्भातील कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुमारे ७६ हजार २२० कोटी रुपये खर्चाच्या या ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी १,४४८ हेक्टर क्षेत्रावर होणार असून पुढील ६० महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक ‘नेक्स्ट जनरेशन’ जहाजे हाताळण्याची क्षमता असलेले हे बंदर भारतातील सर्वात मोठ्या खोल समुद्री बंदरांपैकी एक ठरणार आहे.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या निर्माणाधीन कामांची आणि प्रकल्प आराखड्याची पाहणी केली. कामाचा वेग, दर्जा आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचीही पाहणी करण्यात आली. हा विमानतळ डीएफसी (Dedicated Freight Corridor), बुलेट ट्रेन, उत्तन–विरार सी-लिंक, मुंबई–वडोदरा द्रुतगती मार्ग आणि मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग यांच्या सान्निध्यात उभारला जाणार असल्याने वाढवण व मुरबे बंदरांमधील मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच मुंबई विमानतळावरील वाढता प्रवासी ताण कमी करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या नारिंगी खाडी पुलाच्या कामाचाही आढावा घेतला. सुमारे ८५० कोटी रुपये खर्चाच्या या ४.१० किलोमीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या पुलामुळे वसई-विरारचा सफाळे, पालघर आणि बोईसर या शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून प्रवासाचे अंतर सुमारे ४० किलोमीटरने आणि वेळ ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.

उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. सुमारे ५८ हजार ७५४.५१ कोटी रुपये खर्चाच्या या सहापदरी सागरी सेतूला चारपदरी जोडरस्ते आणि दोन्ही बाजूंना आपत्कालीन मार्गिका प्रस्तावित आहेत. या सेतूची थेट जोडणी मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी होणार असल्याने दक्षिण मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

यावेळी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित तसेच कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना , महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष कार्यकारी संचालक दीपक कपूर , जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल , मीरा-भाईंदर वसई– विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील बंदर, वाहतूक, उद्योग, निर्यात आणि रोजगारवाढीच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील हे सर्व प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार आहेत .

संबंधित पोस्ट

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे-सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे -राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणारआदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

vishwatmaklokswamivarta