vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन..

तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे

प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम राठोड (वय ९०) यांच्या पार्थिवावर आज महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे गुरुवारी (दि.९) दुपारी निधन झाले होते. शासनाच्या वतीने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली.

अंत्यसंस्कार समयी खा. डॉ. कल्याण काळे, माजी खा. इम्तियाज जलील, आ.राजेश राठोड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, प्राचार्य संजीव रेड्डी, गौरसेना अध्यक्ष संजय चव्हाण, बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापुराव राठोड, बापू घडमोडे, प्रा. सुसिंग जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, वसंतराव नाईक महाविद्यालय, बळीराम पाटील विद्यालय येथील शिक्षक, कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मंत्री संजय राठोड यांनी श्रद्धांजलीपर शोकाकूल समुदायासमोर आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, काही माणसं आयुष्य जगत नाहीत, तर हजारो आयुष्यांना जगण्याचा अर्थ देतात. काही व्यक्ती स्वतःसाठी इतिहास घडवत नाहीत, तर समाजाच्या भवितव्याचा इतिहास घडवतात. अशीच एक तेजस्वी ज्ञानज्योत आज अनंतात विलीन झाली.प्राचार्य राजारामजी राठोड यांनी वंचित, शोषित, भटक्या-विमुक्त, तांडा-वाडीतील असंख्य मुलांच्या डोळ्यांतील स्वप्नांना त्यांनी शिक्षणाची पंखे दिली. अनेकांच्या हातात पुस्तक दिले, अनेकांच्या मनात आत्मविश्वास जागवला आणि अनेक कुटुंबांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा दिली. वसंतरावजी नाईक यांनी समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे जे स्वप्न पाहिले, ⁠त्या स्वप्नाचे आयुष्यभर निष्ठेने संवर्धन करणाऱ्या थोर शिलेदारांमध्ये प्राचार्य राजारामजी राठोड यांचे स्थान अग्रक्रमाचे राहील. त्यांनी त्यांनी केवळ महाविद्यालय उभे केले नाही, तर माणसे घडवली; पदवीधर नव्हे तर जबाबदार नागरिक घडवले. वाड्या, वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्यांतील गरीब, गरजू, वंचित मुलांना त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. हजारो विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या प्रेरणेचा, त्यागाचा आणि मायेचा हात कायम राहिला.

 

प्राचार्य राठोड यांच्या पश्चात मुलगे अॅड. अभय राठोड, नितीन राठोड, डॉ. बिपीन राठोड, जावई डॉ. अशोक चव्हाण, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 प्राचार्य राठोड यांनी १९६० ते जून १९६९ दरम्यान उदगीर तालुक्यातील विद्यानिधी हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम केले. १९६६ ते १९७२ दरम्यान उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे संघटन सचिव, १९७२ ते १९९७ या कालावधीत वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. १९६० मध्ये मराठवाड्यात वसतिगृह सुविधा सुरू केली. १९७२ मध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयाची, तर १९८३ मध्ये बळीराम पाटील प्राथमिक शाळेची स्थापना केली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित भटक्या आणि विमुक्त समाजासाठी त्यांनी भरीव काम केले. अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे सचिव म्हणून त्यांनी भरीव काम केले.

०००००

संबंधित पोस्ट

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 | लेखी परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध